
देशात कडक उन्हाळ्यात मे महिन्यात अवकाळी पावसासह वादळीवाऱ्याने थैमान घातले होते. हा काळ महिनाभर सुरू असताना जूनमध्ये मान्सूनचे तडाखे सुरु झाल्याने कृषी संबंधित कामांची पूर्वतयारी बाकी असताना पावसाचे आगमन झाले. केंद्रीय हवामान विभागाने बिहारसह 8 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, दुसरीकडे राजस्थानसह 7 राज्यांना पुन्हा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. यामुळे देशभरात मुसळधार पाऊस आणि ऊनसावल्यांचा खेळ सुरूच असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
यावर्षी पर्जन्यवृष्टी चांगली होणार असल्याचे भाकित असून, सुरुवात चांगली झाली आहे. देशातील अनेक राज्यांत पावसाने हजेरी लावली असून, शेतकरी व संबंधित यंत्रणा कामाला लागली आहे. देशातील 17 राज्यांमध्ये वादळासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यापासून मध्य प्रदेशात पावसाची हजेरी सुरु आहे. आतापर्यंत सलग 43 व्या दिवशी मुसळधार पावसासह वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
ताशी 30 ते 40 किमी वेगाने धुळीचे वादळ येणार
राजस्थानसह राजधानी दिल्ली, हरयाणा, पंजाब, चंदीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये तापमानात वाढ होणार असून, उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेसह ताशी 30 ते 40 किमी वेगाने धुळीचे वादळ येणार असल्याने चिंता वाढली आहे. राजस्थानच्या बिकानेरसह परिसरात 10 जूनदरम्यान तापमान 46 अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे. 24 मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्रासह सिक्कीममध्ये अडकला आहे. मान्सून दाखल होईपर्यंत अनेक राज्यांना अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटांना सामोरे जावे लागणार आहे.
ईशान्येकडील राज्यांत हाहाकार सुरू
गेल्या दहा दिवसांपासून ईशान्य हिंदुस्थानात पावसाच्या मुक्कामाने हाहाकार उडाला असून, एनडीआरएफ, एसडीआरएफसह हवाई दल, लष्कर, आसाम रायफल्स, स्थानिक पोलीस, प्रशासन आणि सामाजिक संस्था मदतीसाठी धावून आल्या. ईशान्येकडील राज्यांमध्ये सततच्या पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. आसाममधील जवळपास 7 लाख लोक प्रभावित झाले असून, मृतांची संख्या 19 वर पोहोचली आहे. भूस्खलनामुळे प्रभावित झालेल्या सिक्कीममधील चाटेन येथून 63 लोकांना हेलिकॉप्टरने वाचविण्यात आले. उर्वरित लोकांना सुरक्षितस्थळी आणण्याचे हवाई दल, लष्कर, आसाम रायफल्स आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. बर्फवृष्टीमुळे, हिमाचल प्रदेशातील धौलाधर पर्वतरांगांमधील तापमानात मोठी घट झाली आहे. मान्सून आतापर्यंत 18 राज्यांमध्ये पोहोचला असून, 10 जूनपर्यंत तो मध्य प्रदेशात पोहोचू शकतो.