सुधागड किल्ल्याकडे जाणाऱ्या पाच्छापूर मार्गावर कंबरतोड प्रवास; रस्त्याची चाळण, वाहनचालक मेटाकुटीला

सुधागड किल्ल्याकडे जाणाऱ्या पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर या मार्गाची अक्षरशः दैना उडाली आहे. या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याची चाळण झाल्याने वाहनचालकांना रोज कंबरतोड प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेकदा खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. या दुर्दशेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

15 वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर हा रस्ता करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत या रस्त्याची एकदाही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मार्गाची रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता अशी अवस्था झाली आहे. येथून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. खड्डे चुकवताना वाहनचालकांच्या नाकीनऊ येत असल्याने अपघात वाढले आहेत. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झाले नसल्याने वाहनचालकांना कंबरदुखी, पाठदुखी आणि मणक्याचे आजार जडले आहेत.

विद्यार्थ्यांची पायपीट
शासनाने गड, किल्ले संवर्धनासाठी निधी उपलब्ध केला आहे. यामध्ये सुधागड किल्ल्याचादेखील समावेश आहे, असे असताना मात्र किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच पाली ते दर्यागावाला जाणारी एसटी सेवा पाच्छापूरपर्यंतच असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना 3-4 किमीपर्यंत पायपीट करावी लागत आहे, असे सामाजिक कार्यकर्ते सिद्धांत गायकवाड यांनी सांगितले