
मेट्रोप्रमाणे लोकलचे दरवाजे जर बंद होतील तर आत प्रवासी गुदमरतील असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मुंबईत यावे आणि परिस्थिती समजून घ्यावी असे मतही राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुंब्र्याजवळ लोकल प्रवाशांचा जो अपघात झाला तो दुर्दैवी आहे. पण मुंबईत एकही असा दिवस जात नाही की त्या दिवशी रेल्वेचा अपघात झालेला नाही. मग प्रश्न असा आहे की ती रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे. मुंबईतल्या लोकांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की मुंबईच्या लोकलसाठी वेगळं महामंडळ करावं. पण ती मागणी काही मान्य होत नाहिये. हा फक्त रेल्वेपुरता विषय नाहिये. सगळ्या शहरांचा आपल्या विचका झालेला आहे. एक तर रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रस्ते नाहीयेत आणि नुसत्या उंचच उंच इमारती उभ्या राहत आहेत. या सगळ्या ठिकाणी आणि रस्ते नसल्यामुळे पार्किंगची व्यवस्था नाही, पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहतूक कोंडी होते. आता पुणे, मुंबई किंवा ठाण्यात सुद्धा आग लागली तर फायर ब्रिगेडच्या गाड्या जायला जागा नाही. अशी आपल्या शहरांची व्यवस्था झाली आहे. शहर नियोजनाचा मुद्दाच नाही. गेली अनेक वर्ष जे मी सांगतोय की आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे बाहेरून येणारे जे लोंढे आहेत याच्यातूनच ही रेल्वे कोलमडली आहे असे राज ठाकरे म्हणाले.
रेल्वेचा बोजवारा का उडाला आहे? अख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे? लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत. ट्रॅफिक साठी वाहनांसाठी रस्ते नाही. मेट्रो आणि मोनो रेल सारख्या सुविधा यामुळे प्रश्न सुटणार नाहीत असेगी राज ठाकरे म्हणाले.
तसेच सगळे जण फक्त आपले निवडणुका बस प्रचार याच्यातच सगळे गुंतलेले आहेत. शहर म्हणून याकडे कोणीही बघायला तयार नाही. दुर्दैव आहे. केंद्र सरकारने या गोष्टींकडे तातडीने लक्ष दिलं पाहिजे. रेल्वे फलाटावरची तुम्ही गर्दी पाहिली तर तुम्हाला प्रश्न पडेल की लोक ट्रेनमध्ये कसे शिरतात. कॉलेजमध्ये असतानाही मी लोकलमधून प्रवास केलेला आहे, त्यामुळे लोकलचा प्रवास काय असतं मला माहित आहे. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा देऊन काय होणार आहे, त्यांनी इथे भेट देऊन परिस्थिती समजून घ्यावी. आता रेल्वेने मेट्रोप्रमाणे दरवाजा बंद होईल अशी यंत्रणा आणणार आहे. यामुळे प्रवासी गुदमरून मरतील. लोकलमधून येण्यासाठी एक जागा आणि जायला दुसरी जागा हवी. आपल्याकडे माणसांची किंमतच नाहिये. अशीच घटना जर परदेशात घडली असती तर गदारोळ झाला असता. आपले मंत्री संत्री जातात परदेशात ते काय इथे नक्की काय घेऊन येतात? काही नाही पण तिथले विचार तरी आणा. विदारक परिस्थिती आहे ही असेही राज ठाकरे या वेळी म्हणाले.