
निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 व मतदार नोंदणी नियम, 1960 नुसार, मतदारयादी मतदान केंद्रनिहाय तयार करण्यात येते. राज्यभरातील 288 मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी ही यादी जवळपास एक लाख मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मदतीने क्षेत्रीय पडताळणी करून तयार केली. या प्रक्रियेत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी, सतत माहितीची देवाणघेवाण केली जाते. आक्षेप घेण्यासाठी आणि अपील करण्यासाठी भरपूर संधीही दिली जाते, अशी सारवासारव राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आज केली.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील मतदान घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. त्याबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आज सविस्तर स्पष्टीकरण दिले.