मोदी, शहा, फडणवीस महाराष्ट्रातील ठाकरे ब्रँड कधीही संपवू शकत नाही; संजय राऊत यांनी ठणकावले

विधानसभा निवडणूक ते लांड्यालबाड्या करून जिंकले आहेत, हे सर्व जगाला समजले आहे. आता मुंबई महापालिका जिंकण्यासाठीही त्यांचे तसेच प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता जनता सावध असल्याने त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावले आहे. तसेच महाराष्ट्र आणि मुंबईतील ठाकरे ब्रँड कोणी, कधीही संपवू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपण मदारी आहोत आणि कोणालाही नाचवू शकतो, असे देवेंद्र फडणवीस यांना वाटत आहे. मात्र, त्यांच्याकडे सत्ता आहे, बिल्डर लॉबी आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे, या जोरावर आपण कोणालाही नाचवू शकतो, असे त्यांना वाटते. मात्र, हे सर्व तात्पुरते आहे. त्यांच्या तालावर कोणीही नाचत नसून ही सर्व बिल्डर लॉबी आणि भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांमुळे होत आहे. त्यामुळे हे सत्ता असेपर्यंत म्हणजेच तात्पुरते आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात जो ठाकरे ब्रँड आहे, तो मोदी, शहा किंवा दवेंद्र फडणवीस कोणीही संपवू शकत नाही. महाराष्ट्र मुंबईत हा ब्रँड अजिंक्य आणि अपराजित आहे. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत जनतेची श्रद्धा, आदर आहे. मराठी माणूस, महाराष्ट्रासाठी ठाकरे कुटुंबाने त्याग आणि संघर्ष केला आहे. स्वाभिमानी महाराष्ट्र आणि मराठी माणूस घडवला, त्याची तुलना कशाचीही होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

मोदी, शहा आणि फडणवीस यांनी कितीही मोठी बिल्डर लॉबी आणली, पैशांचे डोंगर उभे केले, तरी ते ठाकरे ब्रँडशी तुलना करू शकत नाही. विधानसभा निवडणूक ते लांड्यालबाड्या करून जिंकले, मुंबई महापालिकेसाठीही त्यांची तीच तयारी सुरू आहे. मात्र, यावेळी जनता अत्यंत सावध असल्याने त्यांचा डाव यशस्वी होणार नाही, असेही संजय राऊत यांनी ठणकावले..