आजपासून शाळेची घंटा वाजणार; नवी पुस्तके, नवे दप्तर, नवा गणवेश

दीर्घकाळाच्या सुट्टीनंतर उद्यापासून शाळेची घंटा पुन्हा वाजणार आहे. काहींचे पाऊल पहिल्यांदाच शाळेत पडेल तर काही पुढच्या वर्गात प्रवेश करतील. पण बहुतांश विद्यार्थी नवी पुस्तके, नवे दप्तर घेऊन आणि नवा गणवेश परिधान करूनच शाळेत प्रवेश करतील. त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्याची तयारी शाळा व्यवस्थापनांनी केली आहे.

विदर्भ वगळता इतर विभागांमधील शाळा उद्या सोमवार, 16 जूनपासून सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक शाळांनी सुट्टीच्या काळातच वर्गांच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण केले आहे. मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी दुतर्फा रांगोळी घातली जाणार आहे. गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजनही अनेक शाळांनी केले आहे.

सरकारकडूनही शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघरच्या दुर्वेस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत त्यासाठी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील इतर शासकीय शाळांमध्येही लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे बोरिवली (पश्चिम) येथील पोईसर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करणार आहेत. बालवाडी ते दहावीपर्यंत सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि सुजाता खरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे साहित्य दिले जाणार आहे. पहिल्या दिवशी जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील, त्यांना त्याच दिवशी हे साहित्य मिळेल. उर्वरित विद्यार्थ्यांनाही ते ज्या दिवशी शाळेत उपस्थित होतील, त्या दिवशी देण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शालेय साहित्य खरेदीला विलंब होत असल्यामुळे गेल्या काही वर्षांत शाळा सुरू झाल्यानंतरही मुलांना वेळेत साहित्य मिळत नव्हते. मात्र या वर्षी शालोपयोगी साहित्याची खरेदी एप्रिल महिन्यातच पूर्ण करण्यात आली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी हे शालोपयोगी साहित्य मिळणार आहे. त्यात गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दप्तर, बूट, सॅण्डल, मोजे यासह 27 शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता शालेय वेळेत अभ्यासासाठी आधुनिक टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.