
पनवेलच्या गाढी नदीवर 11 कोटी रुपये खर्चुन सिडकोने नवीन पूल उभारला आहे. परंतु या पुलाच्या उद्घाटनासाठी प्रशासनाला मुहूर्तच मिळत नसल्याने हा नवाकोरा पूल वापराविना पडून आहे. त्यामुळे देवद परिसरातील हजारो वाहनचालकांना नाईलाजाने या पुलाच्या बाजूला असलेल्या जुन्या पाइपलाइन पुलावरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे याठिकाणी ‘कुंडमळा’ दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
नवीन पनवेल परिसराला लागूनच देवद हे गाव आहे. या भागाचा गेल्या काही वर्षांत वेगाने विकास झाला असून येथे जवळपास 9 हजार नागरिक वास्तव्यास आहेत. तसेच सनातन संस्थेचे आश्रम याठिकाणी असून देशभरातील अनेक मोठी मंडळी येत असतात. त्यामुळे या भागात नवीन पूल बांधावा, अशी मागणी देवद ग्रामस्थ तसेच हिंदू जनजागृती समितीचे शिवाजी वटकर यांनी केली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदन दिल्यानंतर गाढी नदीवर 11 कोटी रुपये खर्च करून सिडकोने नवीन पूल बांधला. परंतु आजतागायत या पुलाचे उद्घाटन करण्यात आलेले नाही.
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
नवीन पूल बांधला असताना तो वाहतुकीसाठी बंद असल्याने नाईलाजाने वाहनचालकांना जुन्या पाइपलाइन पुलावरून ये-जा करावी लागत आहे. सरकार आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे.