अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन

मराठी साहित्यात निसर्गचित्रणाची हिरवी वाट निर्माण करणारे ज्येष्ठ निसर्ग लेखक, अभ्यासक, ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सोलापूर येथील निवासस्थानी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मारुती चितमपल्ली यांनी अवघं आयुष्य ‘रानवाटा’ तुडवत पक्षी आणि वृक्षाच्या सानिध्यात घालवलं. या समृद्ध अनुभवाने ‘शब्दांचे धन’ वाटत सर्वसामान्यांच्या जीवनात ‘चैत्रपालवी’ आणली! मारुती चितमपल्ली यांच्या जाण्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. पक्षी जाय दिगंतरा! अशी भावना व्यक्त होत आहे.

मारुती चितमपल्ली यांना 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘पद्मश्री ’ने सन्मानित करण्यात आले होते. दिल्लीहून पुरस्कार स्वीकारून परतल्यानंतर ते आजारी पडले होते. त्यांच्या पायाला जखम झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आजार आणि वार्धक्य यामुळे बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले. गेली काही वर्षे सोलापुरात मूळ गावी वास्तव्यास होते.

मारुती चितमपल्ली यांची अंत्ययात्रा गुरुवार, 19 जून रोजी दुपारी 1 वाजता त्यांच्या सोलापूर येथील निवासस्थानापासून निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे भावजय, दोन पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

प्रमुख साहित्यकृती

मारुती चितमपल्ली यांची ‘चकवा चांदणं’ ही आत्मकथा प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर निलवंती, जंगलाचं देणं, घरटय़ा पलीकडे, रातवा, रानवाटा, प्राणीकोश, पक्षीकोश, सुवर्ण गरुड, निसर्गवाचन, शब्दांचे धन, मृगपक्षीशास्त्र, केशराचा पाऊस, आनंददायी बगळे या त्यांच्या कादंबरी प्रसिद्ध आहेत.
जीवन आणि कार्य

  • शिक्षण आणि वनसेवा – मारुती चितमपल्ली यांनी कोईम्बतूर येथील स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वन विभागात 36 वर्षांहून अधिक काळ सेवा केली.
  • कार्यक्षेत्र – मारुती चितमपल्ली यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांसारख्या विविध जंगलांमध्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये काम केले. वन्यजीव संरक्षणात त्यांचे मोठे योगदान आहे. नागझिरा आणि मेळघाट येथे विस्थापित वन्यजीवांसाठी अनाथाश्रम उभारण्यास त्यांनी मदत केली.
  • भाषाज्ञान – मारुती चितमपल्ली यांना 18 भाषांचे ज्ञान होते. ज्यात संस्कृत, जर्मन आणि रशियन भाषांचा समावेश आहे.

साहित्यिक योगदान

मारुती चितमपल्ली यांचे साहित्य मुख्यतः मराठी भाषेत असून, ते वन्यजीव, निसर्ग आणि आदिवासी जीवनावर केंद्रित आहे. त्यांची लेखनशैली ओजस्वी आणि माहितीपूर्ण आहे, जी वैज्ञानिक ज्ञानाला सर्जनशील कथेशी जोडते. त्यांच्या लेखनात वन्यजीवांचे वर्तन, वनस्पती, पक्षी आणि जंगलांशी संबंधित रहस्ये यांचा समावेश आहे. त्यांनी त्यांचे अनुभव वाचकांसमोर जिवंतपणे मांडले आहेत. पक्षीविज्ञान आणि वन्यजीवनाशी संबंधित अनेक नवीन शब्द आणि संज्ञा त्यांनी मराठी भाषेत आणल्या आहेत. अनेक पक्षी शास्त्रीय संकल्पनांना त्यांनी मराठीत नावे दिली आहेत.

पुरस्कार आणि सन्मान

  • पद्मश्री – जानेवारी 2025 मध्ये त्यांना चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्री प्रदान करण्यात आला.
  • विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार – 2017 मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारद्वारे विंदा करंदीकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद – सन 2006 मध्ये सोलापूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते.

निसर्ग आणि माणसांचा शोध

मारुती चितमपल्ली जंगल आणि पक्ष्यांविषयीच्या अभ्यासामुळे अरण्यऋषी म्हणून ओळखले जात होते. आपल्यातील ललित प्रतिभेने त्यांनी निसर्ग आणि माणूस यांचा शोध घेतला. ‘वनविद्येचे तत्त्वज्ञ ललित गद्यकार’ म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले होते. आयुष्यातील बराच काळ ते नागपुरात वास्तव्यास होते. त्यामुळे नागपूरकराशी त्यांचा स्नेह राहिला.

सोलापुरातील एम. पोरे स्कूल व नॉर्थकॉट टेक्निकल हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. पुढे व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील वने आणि वन्यजीवविषयक संस्थांमधून घेतले. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात ढेबेवाडी ते मेळघाट अशी तीस वर्षे त्यांनी सेवा केली. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र विकासात त्यांचे विशेष योगदान राहिले. मारुती चितमपल्ली यांना 13 भाषांचे ज्ञान होते. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित मोठी माहिती मिळवली. त्या माहितीची नोंद केलेल्या आणि 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डाय्रया आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्राrय आधार देत पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण केलं.

लेखनाची हिरवी वाट

अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्टय़ांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली. निळावंती, नवेगावबांधचे दिवस, पक्षी जाय दिगंतरा, चैत्र पालवी, केशराचा पाऊस, शब्दाचं धन, रानवाटा, रातवा, निसर्गवाचन, घरटय़ापलीकडे, पाखरमाया, जंगलाची दुनिया, जंगलाचे देणे, सुवर्ण गरुड अशी कित्येक पुस्तकं त्यांनी लिहिली.

त्यांचे वाचत असताना आपण रानातून वनातून जंगलातून फिरतो, पशुपक्षी, प्राणी आपल्याशी संवाद साधतात असा आपल्याला भास होतो. अभ्यास आणि व्यासंगाला शैलीची जोड देऊन केलेल्या लेखनाने त्यांनी मराठीमध्ये एक वेगळी हिरवी वाट निर्माण झाली.

मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी – मुख्यमंत्री

निसर्गाला शब्दरूपांनी सजीव करणारे आणि मराठी साहित्यात निसर्गसंपदेविषयीच्या अक्षरधनाची भर घालून आपली साहित्य संपदा समृद्ध करणारे अरण्यऋषी म्हणून पद्मश्री मारुती चितमपल्ली अजरामर राहतील. निसर्ग आणि साहित्य क्षेत्रात व्रतस्थ राहून काम करणारे चितमपल्ली यांचे निधन महाराष्ट्रासाठी एक मोठी हानी आहे, त्यांच्या निधनाने एक दीपस्तंभ निमाला आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्पण केली आहे.

एक ऋषितुल्य लेखक – शरद पवार

ऋषितुल्य लेखक मारुती चितमपल्ली यांच्या लेखणीने अनेक पिढय़ांना निसर्गाशी संवाद साधायला शिकवलं. या वनमहर्षीने आपला समृद्ध असा निसर्ग-जीवनानुभव आपल्या 21 ग्रंथांतून शब्दबद्ध केला. मराठी साहित्यात मोलाची भर घातली. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पांच्या सर्वांगीण विकासात त्यांनी दिलेले भरीव योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

निसर्ग चित्रणाची वाट निर्माण करणारा लेखक – मिलिंद जोशी

मराठी साहित्यामध्ये निसर्ग चित्रणाची वाट मारुती चितमपल्ली यांनी निर्माण केली आणि त्यांचे संबंध लेखक वाचत असताना आपण रानातून वनातून जंगलातून फिरतो, पशुपक्षी प्राणी आपल्याशी संवाद साधतात असा आपल्याला भास होत होता, अशी भावना मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली.