
एअर इंडिया विमानाला अहमदाबाद येथे अपघात झाल्यानंतर एअर इंडियाचे दिवस फिरल्याचे दिसत आहे. शनिवारी पाटण्यात एअर इंडियाच्या दोन विमानांनी प्रवाशांच्या सामानाशिवाय लँडिंग केले. पहिले विमान आयएक्स 2936 हे 180 प्रवाशांना घेऊन बंगळुरूहून पाटण्याला लँडिंग झाले. परंतु, प्रवाशांचे सामान मात्र आणायचे विसरले. तर दुसरे विमान एक्सआय 1634 हे चेन्नईहून पाटण्याला आले तेसुद्धा प्रवाशांचे सामान आणायचे विसरले. एअर इंडियाच्या या भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसल्यानंतर विमानतळावर चांगलाच गोंधळ उडाला.
सामान जास्त वजनाचे असल्याने ते आणले नाही, असे हास्यास्पद उत्तर विमान प्रशासनाकडून देण्यात आले. प्रवाशांना सामान न मिळाल्याने ते सर्व जण संतप्त झाले. प्रवाशांनी विमानतळावर प्रचंड गोंधळ घातला. आमचे विमान रात्री 8.30 वाजता बंगळुरूहून पाटण्याला उतरले. घोषणेनंतर आम्ही आमचे सामान घेण्यासाठी गेलो तेव्हा ते तिथे पोहोचले नव्हते, आम्ही विचारणा केल्यानंतर विमान कंपनीकडून भलतेच उत्तर देण्यात आले, असे विमानातील एका प्रवाशाने सांगितले.
विमानात सामान नेण्याचे नियम
देशातील प्रत्येक विमान कंपनीचे सामान नेण्याचे वेगवेगळे नियम आहेत. हे नियम सर्व प्रवाशांना पाळणे बंधनकारक आहेत. सामान नेण्याचे दोन प्रकार असून पहिले केबिन बॅग आहे. तर दुसरे चेक इन बॅग आहे. पहिले तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकता. तर दुसरे एअरलाइन काउंटरवर जमा करावे लागते. दोन्ही प्रकारच्या सामानाचे वजन तिकिटावर लिहिलेले असते. प्रवासी हँडबॅगेत 7 ते 10 किलोपर्यंतचे सामान घेऊन जाऊ शकतात. तर चेक इन बॅगमध्ये 15 ते 30 किलोपर्यंत सामान घेऊन जाऊ शकतात.