
कामगारांच्या घराच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकार कोणाचेही असो, शेवटच्या कामगाराला घर मिळेपर्यंत लढा सुरू ठेवू; मात्र आता झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला स्वस्त बसू देणार नाही, असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी राज्य सरकारला दिला. दरम्यान, मोर्चाची तारीख पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार आहे.
गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी परळ येथील मनोहर फाळके सभागृहात सर्व कामगार संघटनांची आज बैठक झाली. यावेळी 12 कामगार संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व श्रमिक संघटनेचे रमाकांत आंब्रे, कॉ. विजय कुळकर्णी, संयुक्त मराठी मुंबई चळवळचे रमाकांत बने, गिरणी कामगार सेनेचे अध्यक्ष सत्यवान उभे आणि सरचिटणीस बाळ खवणेकर, मुंबई गिरणी कामगार युनियनचे अॅड. अरुण निंबाळकर, एनटीसी कामगार असोसिएशनचे अॅड. बबन मोरे, मनीषा पेडामकर, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे आनंद मोरे, हेमंत धागा जनकल्याण फाऊंडेशनचे हेमंत गोसावी आदी उपस्थित होते.
12 कामगार संघटना एकवटल्या
गिरणी कामगार रोजगार आणि निवारा, कल्याण सेवाभावी संस्था, गिरणी कामगार सभा, सातारा जिल्हा कामगार समिती अशा मिळून 12 कामगार संघटनांचे नेतेही बैठकीला उपस्थित होते. जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे संघटन सचिव राजेंद्र साळसकर यांनी या लढ्याला पाठिंबा व्यक्त केला. बैठकीला कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, कराड जिल्ह्यांतील गिरणी कामगार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे उपस्थित होते.