
आपण कुणाला कॉल केला की, सर्वप्रथम बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर सुरक्षा कॉलर टय़ून वाजते. प्रत्येक कॉलला ही कॉलर टय़ून ऐकू येते. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता मात्र ही कॉलर टय़ून दिवसातून फक्त दोन वेळा ऐकू येईल. एर्मजन्सी कॉलवर तर ती अजिबात वाजणार नाही.
देशातील वाढत्या डिजिटल फ्रॉडपासून नागरिकांना सतर्क करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांच्या माध्यमातून एक सायबर सुरक्षा सूचना कॉलर टय़ूनच्या स्वरूपात जोडली आहे. मात्र प्रत्येक कॉलच्या आधी ही सूचना कॉलर टय़ून वाजते. त्यामुळे लोक त्रस्त झाले. नुकतेच या कॉलर टय़ूनसाठी अमिताभ बच्चन यांना ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता सरकारने सायबर सुरक्षा जागरूकतेसाठीच्या या कॉलर टय़ूनमध्ये बदल केला. हा बदल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱया इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर आणि सायबर दोस्त यांनी घेतलाय. सायबर दोस्तच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भात माहिती देण्यात आलीय. त्यात म्हटल्याप्रमाणे, ‘वारंवार ऐकू येणारी सायबर कॉलर टय़ून तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे. ही फ्रॉडपासून तुमचे रक्षण करते. आता ती दिवसातून फक्त दोनदा वाजेल, आपत्कालीन कॉलमध्ये नाही.’ अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ही टय़ून सायबर फसवणुकीबद्दल लोकांना सावध करण्यासाठी सुरू करण्यात आली होती, पण ती वारंवार वाजल्याने लोकांचा त्रास वाढत होता. यासाठी नियम बदलण्यात आले आहेत.