शेतकऱ्यांचा विरोध असताना शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाचा अट्टाहास का? सुप्रिया सुळेंचे महायुती सरकारच्या धोरणावर बोट

शेतकऱ्यांचा विरोध असताना शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाचा अट्टाहास का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारला आहे. मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, “महाराष्ट्रातील शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठीच्या भूमी संपादनास काही जनप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. महाराष्ट्रात पायाभूत प्रकल्प उभारणे आवश्यक आहे, मात्र भूमी संपादन करताना त्या प्रकल्पाला जो विरोध होतो, त्याचाही संवेदनशीलपणे विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे.शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प साकारल्यास, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महाराष्ट्राला आणखी अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी टिप्पणी महाराष्ट्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने केली आहे. स्थानिकांकडून विरोध असताना या प्रकल्पाचा अट्टाहास का?”

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “शेतकऱ्यांना हा रस्ता नको आहे. हा प्रोजेक्ट झाला तर महाराष्ट्र अधिक अडचणीत येईल. महाराष्ट्र सरकारचे डॉक्युमेंट पाहा. विरोध होतोय अर्थिक परिस्थिती बेताची असताना लोन घेऊन प्रोजेक्ट कशाला केले जात आहेत. फायनान्स घेत असताना गांभीर्याने विचार करावा. ह्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना सरकार भरपाई द्यायची असती. हा कायदा आहे. ⁠चार पट अधिकार शेतकऱ्यांना दिले पाहिजे. पैसे देतात म्हणजे उपकार करत नाहीत.शेतकऱ्यांना जमिनी विकायची नाही. ⁠खिशात पैसे नाही. हे फायनान्स मिन्स्ट्री म्हणते 22 टक्के बजेट इंट्रेस्ट भरण्यात जाणार असेल तर राज्याची प्रगती कशी होणार? फायननस मिनिस्ट्रीची नोट्स आहे.”