जगद्गुरु तुकोबांच्या पालखीचे बेलवाडीत रंगले गोल रिंगण

>> नीलकंठ मोहिते

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले मानाचे गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे आज संपन्न झाले. मानाचे दोन अश्व गोल रिंगणात सोडून या अश्वांच्या तीन परिक्रमांनी वारकऱयांनी सांप्रदायिक खेळ खेळत पहिले गोल रिंगण उत्साहात पार पडले. यावेळी ‘ज्ञानेश्वर माउली…तुकाराम…’ असा एकच जयघोष झाला.

धन्य मी मानीन आपुलें संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामीं ।। धन्य जालो आतां यासि संदेह नाहीं । न पडे या वाहीं काळा हाती ।।

ब्रह्मरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ।।

विठ्ठलनामाचा महिमा गात निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण टाळकरी, वीणेकरी, पताकावाले, पखवाजवाले व तुळशीवाल्या महिला आणि मानाचे अश्व यांनी सुरू असलेल्या हरिनामाच्या गजरात परिक्रमा पूर्ण करीत गोल रिंगणाने लाखो नयनांचे पारणे फेडले. ‘ज्ञानोबा… तुकाराम…’च्या गजराने बेलवाडी दुमदुमली.

सणसर गावच्या हद्दीतील मुक्काम आटोपून सकाळच्या प्रहरात पालखी बेलवाडीकडे मार्गस्थ झाली. बेलवाडीत पहिले गोंल रिंगण असल्याने इंदापूर, बारामती, दौंड तालुक्यांतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तुकोबारायांचा पालखीरथ रिंगणस्थळी सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी दाखल झाला. गावकऱयांनी पालखी खांद्यावर घेत रिंगणस्थळावरील शामियान्यात जयघोष करीत आणली.

यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि पालखी विश्वस्तांच्या हस्ते रिंगण सोहळ्यात मानाच्या अश्वांचे पूजन करण्यात आले. तहसीलदार जीवन बनसोडे, अर्जुन देसाई, मयूरी जामदार, शुभम निंबाळकर आदी उपस्थित होते.

पांडुरंगा काहि आईकावी मात!
न करावे मुक्त आता मज!
जन्मांतरे मज तैशी देई देवा!
जेणे चरण सेवा घडे तुझी!

असे म्हणत बेलवाडीकरांनी वारकऱयांचा पाहुणचार केला. अशीच सेवा जन्मोजन्मी मिळू दे, असे साकडे गावकरी घालत होते. दुपारच्या विश्रांतीसाठी गावकऱयांनी गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करीत पालखी गावातील मारुती मंदिरात आणली. यावेळी तोफांची सलामी देण्यात आली. दुपारची न्याहरी घेऊन पालखी सोहळा लासुर्णे जंक्शन, अंथुर्णेमार्गे निमगाव केतकीकडे मार्गस्थ झाला.