अहिल्यानगरमधून धावणार एसटीच्या 250 जादा बस; आषाढी वारीसाठी नियोजन

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने 250 जादा बसची व्यवस्था केली आहे. तारकपूर बसस्थानकातून 2 जुलैपासून जादा बस पंढरपूरसाठी धावणार आहेत. प्रवाशांसाठी महामंडळाने ज्या सवलती दिलेल्या आहेत, त्या सर्व सवलती या जादा बसलादेखील लागू असणार आहेत. दरम्यान, सध्या दररोज दहा ते बारा बस पंढरपूर वारीसाठी सुरू आहेत, अशी माहिती एस. टी. विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी दिली आहे.

6 जुलैला आषाढी एकादशी आहे. यानिमित्ताने पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातून भाविक जात आहेत. या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदादेखील महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाच्या वतीने 250 जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आगारनिहाय बसची व्यवस्था केली आहे. संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, नेवासा आदी आगारांच्या बस तारकपूर बसस्थानकामार्गे पंढरपूरला जाणार आहेत. तारकपूर आगारातून 40 जादा बसचे नियोजन आहे. याशिवाय धुळे आणि जळगाव येथून येणाऱया बसदेखील तारकपूरमार्गे पंढरपूरला रवाना होणार आहेत. पंढरपूर वारीसाठी 10 जुलैपर्यंत बस धावणार आहेत.

…तर थेट गावातून बसची व्यवस्था

पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारे 44 भाविक एकाच गावातील असल्यास आणि त्यांनी मागणी केल्यास बस थेट त्या गावात पाठवली जाणार आहे. या भाविकांना पंढरपूर नेणे आणि दर्शन आटोपल्यानंतर थेट घरी सोडण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची असणार आहे. गावासाठी स्पेशल बस हवी असल्यास एसटी आगारप्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन एस. टी. विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी केले आहे.