पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकाचा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू; शॉक लागून भाजलेल्या गणेशची मृत्यूशी झुंज अपयशी

महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे लोंबकळणाऱ्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन गंभीर भाजलेल्या गणेश डुबुकवाड या युवकाची आठ दिवस मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. शनिवारी उपचारा दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. पोलीस भरतीची जिद्द ठेवून प्रचंड मेहनत घेणाऱ्या होतकरू युवकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने महावितरण कंपनीविरोधात शंकरनगर येथे संतप्त जनभावना दिसून येत आहे.

शंकरनगर येथील गणेश डुबुकवाड (22) पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याकरिता सरावासाठी तो धुप्पा शिवारातील पायवाटेने जात असे. येथूनच गेलेल्या महावितरणच्या मुख्य वीज वाहिनीच्या एका खांबावरील चिमणीतून निघालेली तार मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात जमिनीच्या दिशेने लोंबकळत होती. परंतु महावितरणने दुर्लक्ष केले.

20 जून रोजी नेहमीप्रमाणे सराव करून धुप्पा शिवारातील पायवाटेने परत येत असतानाच त्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारेला गणेशचा स्पर्श झाला. त्यात वीजप्रवाह सुरू असल्याने जबर शॉक लागून तो गंभीर भाजला गेला. महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ओढवलेल्या या घटनेत गणेशचे पूर्ण शरीर भाजले होते. याप्रकरणी महावितरण विरोधात कामात हलगर्जीपणा केल्याचा गुन्हाही दाखल झाला होता. अत्यावस्थ स्थितीत आठ दिवस गणेशवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु शरीराची बहुतांश त्वचा जळून गेल्याने प्रकृती चिंताजनक होती. उपचारासाठी शंकरनगर येथील नागरिकांनी मदत निधी देखील जमा करून दिला होता. शेवटी नियतीने डाव साधला अन् शनिवारी सकाळी गणेशने अखेरचा श्वास घेतला. यामुळे शंकरनगर येथे शोककळा पसरली.

शनिवारी दुपारी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत गणेश डुबुकवाड याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डुबुकवाड कुटुंबीयांची परिस्थिती अतिशय हलाखीची असून कुटुंबातील तरुण मुलगा गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.