भाजपच्या राज्यात हे काय चाललंय? मरणाचं ट्रॅफिक; इंदूरमध्ये वाहतूककोंडीमुळे तिघांचा मृत्यू

वाहतूककोंडीमुळे एखाद्या ठिकाणी जायला उशीर झाला तर ‘मरणाचं ट्रफिक होतं’ असे आपल्याकडे सहज म्हणतात. पण सहज उच्चारला जाणारा हा शब्द इंदूरमध्ये दुर्दैवाने खरा ठरला आहे. इंदूरमध्ये एका मार्गावर तब्बल 32 तास झालेल्या वाहतूककोंडीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भाजपच्या राज्यात हे काय चाललंय, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांनी दिली.

सहा पदरी पूल बांधणी, अर्धवट बांधकाम झालेला सर्व्हिस रोड आणि वाहतूक वळविण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्यामुळे ही कोंडी झाली. त्यात पाऊस आणि रस्त्यावरील खड्डय़ांची भर पडली. त्यामुळे गुरुवारी दुपारी लागलेले हे ट्रफिक शुक्रवारी रात्रीपर्यंत कायम होते. ही वाहतूककोंडी फुटण्यासाठी तब्बल 32 तास लागले. तोपर्यंत या मार्गावर गाडय़ांची रांग 8 किलोमीटरपर्यंत गेली होती. या कोंडीत अडकल्यामुळे प्रकृती बिघडून तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या मार्गावरील अनेक गाडय़ा पर्यायी रस्त्यांवरून वळवण्यात आल्या.

दोन्ही ऑक्सिजन सिलिंडर संपले!

मृत्यू झालेल्यांमध्ये 65 वर्षांचा एक शेतकरी होता. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. कसेबसे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. बलराम पटेल हे 55 वर्षीय कॅन्सर रुग्ण रुग्णालयात जात होते. मात्र हा रुग्ण ज्या दोन ऑक्सिजन सिलिंडरवर अवलंबून होता, ते संपल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर 32 वर्षांच्या तरुण सुरक्षा रक्षकाला छातीत वेदना होऊ लागल्या. त्यातच त्याचा मृत्यू झाला.