
ओदिशातील पुरी येथे जगन्नाथ यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झाला. तर 50 भाविक जखमी झाले आहेत. जखमींमधील सहा जणाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. चेंगराचेंगरी झाली त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नव्हती. पुरेसे पोलीस बळ आणि सुरक्षा दलाचे जवानही मोठय़ा संख्येने तैनात नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान काही भाविकांनी चेंगराचेंगरी होत असताना पोलीस घटनास्थळावरून पळून गेले असा आरोप केला आहे. ”माझी पत्नी बेशुद्ध पडली होती. तिला मला रुग्णालयात न्यायाचे होते. इतर भाविकांच्या मदतीने मी तिला रुग्णालयात नेले पण मदतीसाठी पोलीस कुठेच नव्हते. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा पोलीस स्वत:ला वाचवण्यसाठी पळू गेले”, असे दिलीप साहू या भाविकाने सांगितले आहे. दिलीप साहू यांची पत्नी बसंती साहू (36) यांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे.
“या सोहळ्याचे योग्यरित्या नियोजन झाले नव्हते. रविवार असल्याने गर्दी वाढत होती. लोकं एकमेकांवर पडत होती. तिथे गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांची आवश्यकता होती मात्र पोलीस कुठेच नव्हते”, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.