कोणाचीही समिती बसवली तरी महाराष्ट्रावर आता कोणाचीही सक्ती होऊ शकत नाही – उद्धव ठाकरे

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधिमंडळात हजर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारची सालटी काढली.

“‘जय महाराष्ट्राचा नारा पुन्हा एकदा बुलंद झाला. हा नारा बुलंद करण्यामध्ये शिवसेना शिवसैनिक आघाडीवर होते. त्यांच्यासोबत ज्या ज्या राजकीय पक्षांनी पक्षभेद बाजूला ठेवून सहभाग घेतला. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”सरकारला शहाणपण सुचलं की नाही हे लवकरच कळेल. तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. पण जर का त्यांनी तो जीआर रद्द केला नसता तर पाच तारखेच्या मोर्चात आमच्या सहित भाजप, एसंशि, अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी सहभागी होणार होते. त्या सर्वांना सुद्धा धन्यवाद देतोय. मातृभाषेचं प्रेम पक्षाच्या पलिकडे असलं पाहिजे. आता या प्रकरणात एक समिती नेमली आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या पांडित्याचा बुद्धिमत्तेचा आदार राखून सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका. शिक्षणाचा विषय आहे. शिक्षणाच्या विषयात तुम्ही अर्थतज्ञ नेमलेला आहे. समिती काहीही असू दे पण सक्ती विषय संपलेला आहे. त्यामुळे कोणाचीही समिती बसवली त्यामुळे आता महाराष्ट्रावर कोणाचीही सक्ती होऊ शकत नाही हे मराठी माणसाच्या एकजुटीने दाखवून दिलं आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठीद्रोही डोकं वर काढत आहेत. काल हे डोकं आपण पार चिरडून टाकलंय. पुन्हा ते वर येऊ नये असं वाटत असेल तर आता ही एकजूट कायम ठेवली पाहिजे. या एकजूटीचे दर्शन येत्या 5 तारखेला घडवल्याशिवाय राहणार नाही. 5 तारखेला आम्ही विजयोत्सव साजरा करणार आहोत. आंदोलनात जी एकजूट होती तीच एकजूट विजयोत्सवात दाखवायची आहे. मराठी अमराठी करायचं. मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची. हा या सरकारचा एक कुटिल डाव होता. पण ही फूट पडत नाही, वेगळे होत नाही. त्यामुळे मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून जीआर रद्द केला”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”मला उत्सुकता आहे की कमळी कोणत्या भाषेतून शिकली असेल. हे म्हणतात कमळीला 100 पैकी 100 मार्क मिळाले . कमळीला मार्क मिळाले शंभर कमळी आमची एक नंबर. कमळी आमची. कमळी कोणत्या शाळेत शिकली, तिने शंभर मार्क कसे मिळवले. त्यातही ईव्हीएम वापरलं होतं का? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.