बुलढाण्यात शेतकऱ्यानं घेतली जलसमाधी; आंदोलन सुरू असताना नदीपात्रात उडी मारली

बुलढाणा जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी एका शेतकऱ्याने नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतल्याची खळबळजनक घटना घडली असून अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. विनोद पवार असे तरुणाचे नाव असून बचाव पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ खुर्द परिसरात जिगाव प्रकल्प पुनर्वसनाच्या प्रश्‍नावर आंदोलनादरम्यान विनोद पवार या शेतकऱ्याने नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेतली. स्वातंत्र्य दिनी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी ही घटना घडली. पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, शनिवारी पहाटेपासून बचाव पथक शोधमोहिम राबवत आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्या समन्वयाने जीवरक्षक ओम साई राम फाउंडेशन, रुक्माई फाउंडेशन आणि स्थानिक पथक शोधकार्य करीत आहेत. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली होती, मात्र अद्यापही पवार यांचा थांगपत्ता लागलेला नाही.

सुप्रिया सुळेंनी केला सरकारचा निषेध

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी विनोद पवार यांनी जलसमाधी घेतली. जिगाव प्रकल्पग्रस्त आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या विविध समस्यांवर शासनाकडून तोडगा काढण्यात आला नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी जलसमाधी घ्यावी लागत असेल तर ही अतिशय खेदजनक बाब आहे. शेतकऱ्यांना हे टोकाचे पाऊल उचलायला लावण्यास भाग पाडणाऱ्या या सरकारचा तीव्र निषेध. शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता केलीच पाहिजे ही आमची भूमिका आहे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.