राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा; जवाहर चौक पाण्याखाली

आठवडाभर संततधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासुनच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत पोहोचले असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. शीळकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेला असून शहरातील बहुतांशी भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे . तर व्यापाऱ्यांनी दुकानातील वस्तू सुरक्षितस्थळी नेल्या आहेत.

सोमवारी मध्यरात्रीपासुन पावसाचा जोर वाढल्याने अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ होत कोदवली नदीचे पाणी शहर बाजारपेठेत शिरले आहे . शहरातील भटाळी , गुजराळी , वरचीपेठ , चिंचबांध , आंबेवाडी आदी भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत . मंगळवारी पहाटे पुराच्या पाण्याचा जोर जास्तच वाढल्याने राजापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील वस्तू सुरक्षित स्थळी नेण्यास सुरुवात केली आहे. शहरातील शिवाजी पथ रस्ता पुर्णत: पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील व्यापाऱ्यानी व रहिवाशानी आपले सामान सुरक्षित स्थळी हलवले आहे .

सकाळी 6 वाजता शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी भरल्याने शहरातील संपुर्ण वाहतुक व्यवस्था कोलमडली आहे. हवामान खात्याने मंगळवारी कोकणातील जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्रीच जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाना सुट्टी जाहीर केली आहे . आजच्या पावसाने तालुक्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या दरम्याने अनुस्कुरा घाटात दरड कोसळली असुन घाटमाथ्यावर जाणारी वाहतुक बंद झाली आहे . प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ यंत्रणा पाठवुन दरड बाजुला करण्याचे काम हाती घेतले आहे.