
गेले तीन दिवस मुंबईसह महाराष्ट्राला झोडपलेल्या पावसाने आज मात्र मुंबईत उसंत घेतली. मात्र राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस बरसल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आला. रत्नागिरीमध्येही पावसाचा जोर कायम असून 32 धरणे तुंडुंब भरून वाहू लागली आहेत.
मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत तीन दिवस अक्षरशः धुमाकुळ घातलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी नाशिकसह कोकणाच्या अनेक भागांत जोरदार सरी बरसल्या. नाशिकमध्ये पुरामुळे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले. गंगा-गोदावरी मंदिर अर्ध्याहून जास्त पाण्याखाली गेले. इगतपुरीमधील तीन पाडयांशी संपर्क तुटला. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागला. दरम्यान, अतिवृष्टीमुळे मुंबईसह राज्यभरात चार दिवसांत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.