हे तर फसवे सरकार ! एकतानगरमधील नागरिकांचा रोष

दरवर्षी आमच्या भागातील इमारतीमध्ये पाणी शिरते. अनेकांचे लाखोंचे नुकसान होते. नेतेमंडळी येतात, आश्वासनाची खैरात करून जातात. मात्र, पुढे काहीच होत नाही. आज येथील रस्त्यांवर व इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे. उद्यापासून नेतेमंडळी येतील, पाहणी करतील अन् पुन्हा आश्वासनांची खैरात करतील. मात्र, आत्तापर्यंत कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. केवळ स्थलांतर करून काही उपयोग नाही. हे फसवे सरकार असल्याचा संताप सिंहगड रस्ता भागातील एकतानगरमधील नागरिकांनी व्यक्त केला.

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील सिंहगड रस्ता येथील एकतानगरसह इतर अनेक भागांतील सोसायटी, घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

धरणातून पाणी सोडल्यानंतर सिंहगड रस्ता भागातील एकतानगरसह अन्य भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरते. गेल्या वर्षीही या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी या भागाच्या सुरक्षेसाठी सीमाभिंत बांधली जाईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. सुरक्षा भिंत अद्याप बांधण्यात आलेली नाही. वेळच्या वेळीच जर ही भिंत बांधण्यात आली असती, तर ही वेळ आली नसती. मागील वर्षीदेखील आमचे संसार उघड्यावर पडले होते. त्यावेळी सगळे मंत्री आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी संरक्षण भिंत तसेच पुनर्वसन करून देतो, असे सांगितले होते. मात्र, त्यांनी केवळ आश्वासन दिले. वर्षभरात काहीच केले नाही. महापालिकेने देखील राज्य शासनाला ३०० कोटींची मागणी केली आहे. परंतु अद्याप रुपयाही मिळाला नसल्याने हे सरकार फसवे असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.

पूर आला की सगळे येणार आणि आश्वासनाची खिरापत देणार, पुन्हा जनतेला फसवणार. मात्र, नागरिक आहे तिथेच संकटात राहत आहेत. सत्ताधारी भाजप प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्यात मश्गुल आहेत. हे सरकार फसवे आहे.
– अनंत घरत, प्रसिद्धिप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे.