
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार निर्मलाताई ठोकळ (वय ८५) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या वृद्धापकाळाने आजारी होत्या. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव सकाळी अकराच्या सुमारास मुरारजी पेठेतील तोरणा बंगला येथे आणण्यात येणार असून, आज सायंकाळी पाच वाजता पुणे रोड, बाळे स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निर्मलाताई यांनी काँग्रेस पक्षाकडून राजकारणात कायम सक्रिय भूमिका बजावली होती. त्या सोलापूर शहरातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. स्थानिक राजकारणापासून ते राज्याच्या पातळीवरील राजकारणापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. स्थानिक प्रश्नांवर त्यांची पकड ही जबरदस्त होती.
राजकारणासह त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान होते. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा म्हणून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करुन त्यांनी दिली होती. त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली संस्थेने अनेक मान्यवर गुणी विद्यार्थी घडवले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना व नातवंडांचा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस परिवारासह शैक्षणिक क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय तुळशीदास जाधव यांच्या त्या कन्या होत्या.
सोलापुरात आयोजित केलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या संयोजनामध्ये त्यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी त्या स्वर्गीय मारुती चित्तमपल्ली यांच्या समावेत मातोश्री येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मोठा सहभाग होता माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या त्या नातेवाईक होत्या.