
महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे महाभयंकर पुरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गावच्या गाव उद्ध्वस्त झाली आहेत, शेतजमीनी खरडून गेल्या आहेत, जनावरे व गुरेढोरे मृत्यूमुखी पडले आहेत, संसार डोळ्यादेखत पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा शुन्यातून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे सरकारने कोणतेही निकष न लावता तिजोरी खुली करून पुरग्रस्तांना भरघोस मदत करत संपूर्ण कर्जमाफी करावी यासह विविध मागण्या संभाजी ब्रिगेडने सरकारकडे केल्या आहेत.
सोमवारी (29 सप्टेंबर 2025) संपूर्ण महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागरण गोंधळ आंदोलन छेडले. हाताशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची जगण्याची उमेद संपुष्टात आली आहे. या भीषण परिस्थितीमुळे येणाऱ्या काळात शेतकरी आत्महत्या करतील, अशी भीती निर्माण झाली आहे. या भीषण परिस्थितीत सरकारने कोणतेही निकष न लावता तिजोरी खुली करून पूरग्रस्तांना भरघोस मदत करावी, हेक्टरी किमान 1 लाख रुपयांची मदत, गुराढोरांना बाजारभावानुसार नुकसानभरपाई तसेच शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेश गणपतराव परकाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष इंजी. शाम जरे, पारनेर तालुकाध्यक्ष सचिन काकडे, नगर तालुकाध्यक्ष महेश दानवे, तसेच सुयोग धस, दिलीप वाळुंज, बापू जगताप, अच्युत गाडे, तरटे तात्या, विकास उदगीरे, अंबादास जाधव, संदीप मांडरे, सागर भोस, शंतनु जाधव, अमोल आगलावे, देविदास गवळी, विकास पवार, दिलीप आगलावे, संतोष कोकाटे, सुभाष आगलावे, बालू बोरुडे, धोंडीराम आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.