
क्रिकेट बोर्ड मोठ्या साहेबांच्या मोठ्या मुलाच्या हातात आहे. नियम ठरवणारे आपणच आहोत. पाकिस्तानशी मॅच खेळलो नसतो तर काही वाकडं झालं नसतं; पण कोट्यवधींची कमाई होत असेल तर कसली राष्ट्रीयता आणि कसली देशभक्ती, अशा शब्दांत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हल्ला चढवला.
पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोक मारले गेले. त्यांची हत्या करण्यात आली. हा हल्ला ज्यांनी केला त्या पाकिस्तानशी तुम्ही क्रिकेट खेळताच कसे, असा सवाल जलील यांनी केला. मॅच संपल्यानंतर आम्ही शेकहँड केले नाही म्हणता मग बोलिंग आणि बॅटिंगही डोळे बंद ठेवून केली का? काय हा फालतूपणा, तुम्ही कोणाला मूर्ख बनवता, असा सवाल जलील यांनी केला. पाकिस्तानसोबत आशिया चषकात खेळलो नसतो तर हिंदुस्थान कोणत्याही स्थितीत दहशतवादी देशासोबत संबंध ठेवणार नाही हा कठोर संदेश जगात गेला असता, असे जलील म्हणाले.
इतका हा कप महत्त्वाचा होता का?
पाकिस्तान हिंदुस्थानात दहशतवाद पसरवत आहे. हा देश म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा आहे, असे आपले परराष्ट्रमंत्री जयशंकर संयुक्त राष्ट्रांत जाऊन सांगतात. दुसरीकडे आपण त्याच पाकिस्तानशी क्रिकेट खेळतो. हे कशासाठी? ही स्पर्धा आणि हा कप इतका महत्त्वाचा होता का, असा सवालही त्यांनी केला.
गुवाहाटीतून आणलेले पैसे पूरग्रस्तांना द्या!
गुवाहाटीतून ज्यांनी पैसे आणलेत त्यांनी त्यांची तिजोरी उघडली आणि ते सगळे पैसे दिले तर महाराष्ट्रात पूरसंकटामुळे जे लोक त्रस्त आहेत त्यांचं दुःख एका मिनिटात संपेल, अशा शब्दांत महायुती सरकारला जलील यांनी सुनावले.






























































