औटघटकेचा युद्धविराम; पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला, 3 क्रिकेटपटू ठार, राशिद खानचा संताप

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानने काबूलवर हवाई हल्ला केल्यानंतर अफगाणिस्तानने जोरदार प्रत्युत्तर देत सीमेजवळील पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करत त्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर दोन्ही देशात 48 तासांचा युद्धविराम झाला होता. मात्र यानंतर काही तासात पाकिस्तानने पक्तिका प्रांतात हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यामध्ये अफगाणिस्तानचे तीन तरुण क्रिकेटपटू ठार झाले आहेत.

पाकिस्तानने शुक्रवारी रात्री पक्तिका प्रांतातील उरगून आणि बरमल जिल्ह्यात हवाई हल्ले केले. रहिवासी भागांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले असून यात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून या तरुण क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास नकार दिला असून नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या तिरंगी मालिकेतून माघार घेतली आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेत ही तिरंगी टी-20 मालिका खेळली जाणार होती.

राशिद खानने व्यक्त केला संताप

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार राशिद खान याने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून तिरंगी मालिकेतून माघार घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात महिला, मुले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणारे तरुण क्रिकेटपटूही ठार झाले. निष्पापांचा जीव गमावल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्ध आगामी तिरंगी मालिकेतून माघार घेण्याच्या अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाला माझे समर्थन असून या कठीण काळात मी देशाच्या नागरिकांसोबत आहे, असे राशिदने म्हटले.

मृतांचा आकडा वाढला

दरम्यान, पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 40 नागरिकांचा मृत्यू झाला असून 170 हून अधिक जखमी झाल्याची माहिती आरोग्य अधिकारी करिमुल्लाह झुबैर आगा यांनी ‘टोलो न्यूज’ला दिली. मृतांमध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त असून मोठी वित्तहानीही झाली आहे.

पाकिस्तानसोबत क्रिकेट बंद; हिंदुस्थानला जमलं नाही ते अफगाणिस्ताननं करून दाखवलं, हवाई हल्ल्यानंतर तिरंगी मालिका खेळण्यास नकार