
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते असरानी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त असलेल्या असरानींवर गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते.
असरानींच्या निधनाची बातमी समोर येताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दीपावळीच्या आनंदाच्या दिवशी ही दुःखद बातमी समोर आली आहे. याबाबत माहिती देताना त्यांचे मॅनेजर बाबुभाई यांनी सांगितलं की, “दीर्घकाळापासून फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त ते त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यातच आज त्यांचं निधन झालं.”
असरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं. १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे जन्मलेले असरानी यांनी जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९६७ मध्ये ‘हरे कांच की चुडियां’ या चित्रपटातून असरानी यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
असरानींच्या सर्वात संस्मरणीय भूमिकांपैकी, शोले चित्रपटातील जेलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या चित्रपटातील त्यांचा संवाद, “हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं.”, खूप प्रसिद्ध झाला आणि अनेक दशकांनंतरही लोक अजूनही त्या संवादाने असरानींना ओळखतात. कोशिश (१९७३), बावर्ची (१९७२), चुपके चुपके (१९७५), छोटी सी बात (१९७५), आणि शोले (१९७५) हे त्यांचे अविस्मरणीय चित्रपट आहेत.