
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडचे 41 हजार 619 रुपये एवढे वीज बिल राज्य सरकारने थकवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे महायुतीचे छत्रपती शिवरायांवरील बेगडी प्रेम उघड झाले असून शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. विविध योजनांवर कोटय़वधी रुपयांची खैरात केली जात असतानाच छत्रपतींच्या रायगडावरील विजेचे बिल भरण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत काय, असा सवाल निर्माण झाला आहे.
महाराष्ट्राचे वैभव असलेला रायगड किल्ला पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पर्यटक येत असतात. तसेच दुर्ग अभ्यासकदेखील येतात. शिवराज्याभिषेक दिन व छत्रपतींच्या पुण्यतिथीदिनी लाडक्या राजाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून हजारोंच्या संख्येने मावळे कूच करतात. शिवछत्रपतींच्या नावाने महायुती राज्याचा कारभार करीत असतानाच रायगडावरील विजेचे बिल थकवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रायगडावर महावितरणच्या वतीने वीजपुरवठा केला जातो. त्याचे बिल भरण्याची जबाबदारी पुरातत्व विभागावर आहे.
महावितरणकडून अद्यापी वीज बिलच प्राप्त न झाल्याने ते भरले गेले नाही. बिल वेळेत मिळाले असते तर आम्हीदेखील वेळेत भरणा केला असता. बिलासाठी आमच्या खात्यात तरतूद केली आहे. येत्या दोन दिवसांत जे बिल थकीत आहे ते भरण्यात येईल. – राजेश दिवेकर, (संरक्षक सहाय्यक, पुरातत्व विभाग)
किल्ले रायगडचा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये झाला असून लाखोच्या संख्येने शिवभक्त व पर्यटक वर्षभरात रायगडावर येत असतात. तेथे पुरेसा विद्युत पुरवठा नसल्याने तसेच राहण्याची सोयदेखील नाही. त्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. गडावरील वीज बिल थकले असल्यास ते लवकरात लवकर भरावे. जागतिक वारसा यादीतील रायगडचे मानांकन टिकून राहावे यासाठी सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. – सुरेश पवार, (अध्यक्ष कोकणकडा मित्रमंडळ)
थकबाकीचा लेखाजोखा
किल्ले रायगडावर बुकिंग ऑफिस, जगदीश्वर मंदिर, राजदरबार येथे महावितरणचे एकूण तीन मीटर बसवण्यात आले आहेत. तिन्ही ठिकाणचे बिल वेगवेगळे येते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे बिलच भरलेले नाही. रायगड बुकिंग ऑफिसचे 6 हजार 588 रुपये, जगदीश्वर मंदिराचे 11 हजार 708 रुपये तर राजदरबाराचे 23 हजार 323 रुपये एवढे बिल बाकी आहे. एकूण बिलाची थकबाकी 41 हजार 619 रुपये एवढी असल्याचे दिसून आले आहे.
जाहिरात पुन्हा चर्चेत
मराठा आरक्षणासाठी मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. त्यानंतर सरकारने मराठा आरक्षणाबाबत जीआर काढला. दरम्यान अनंत चतुर्दशी दिवशी अनेक वर्तमानपत्रांमध्ये ‘देवाभाऊ’ अशी पूर्ण पान निनावी जाहिरात झळकली होती. मुख्यमंत्री फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत आहेत, अशी ती जाहिरात होती. या जाहिरातीवर 40 कोटी खर्च केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. हा जाहिरातदार कोण, असा सवालही विचारला होता. आता रायगडाचे 41 हजारांचे वीज बिल थकवले असताना ती जाहिरात पुन्हा चर्चेत आली आहे.



























































