आता 21 दिवसांत मिळणार रिफंड, डीजीसीएच्या नव्या नियमामुळे विमान प्रवाशांना दिलासा

mumbai-airport

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नागरिक उड्डाण मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. फ्लाईटने जाणाऱ्या प्रवाशांनी जर अचानक विमान तिकीट रद्द केले तर तिकिटाच्या पैशांसाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागायची, परंतु आता तिकीट रद्द केल्यानंतर अवघ्या 21 दिवसांत प्रवाशांना तिकीट रिफंड मिळणार आहे. डीजीसीएच्या नव्या नियमामुळे विमान प्रवाशांना लवकर रिफंड मिळू शकणार आहे.

डीजीसीएने प्रवाशांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत एअरलाईन तिकीट रिफंड सिस्टमला सुधारण्यासाठी हा नवीन नियम आणला आहे. या नियमांतर्गत आता एअरलाईन्सला दिलेल्या वेळेत प्रवाशांना रिफंड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. डीजीसीएने आपल्या नव्या सीव्हिल एविएशन रिक्वॉरमेंट्स ड्राफ्टमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या नियमाचा उद्देश हा आहे की, प्रवाशांना तिकीट रद्द करणे किंवा फ्लाइट मिस झाल्यास लवकर आणि संपूर्ण रिफंड मिळणे आवश्यक आहे. हिंदुस्थानात ऑपरेट करणाऱ्या विदेशी एअरलाईन्सला हे नियम लागू होतील. रिफंड टाईमलाईन आणि प्रोसेसिंग सिस्टमचे पालन सर्वांना सारखेच करावे लागतील.

  • 21 दिवसांत रिफंड – जर तिकीट कोणत्याही ट्रव्हल एजंट किंवा ऑनलाईन पोर्टलवरून बुक केले असेल तर एअरलाईनला 21 दिवसांच्या कामकाजाच्या आत प्रवाशांना रिफंड द्यावा लागेल.
  • सर्व रिफंड परत – एअरपोर्ट टॅक्स, फ्युअल फी आणि अन्य चार्जसुद्धा रिफंड करावे लागतील. जर भाडे नॉन-रिफंडेबल असेल तरीही कंपनीला ते द्यावे लागतील.
  • 48 तासांची फ्री लुक इन – जर तिकीट बुक केल्यानंतर 48 तासांच्या आत तिकीट रद्द केले तर कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही.
  • रिफंड टू क्रेडिट – एअरलाईन्स आता प्रवाशांच्या परवानगीविना क्रेडिट शेल (ट्रव्हल व्हाऊचर) बनवणार नाही.
  • पारदर्शिकता महत्त्वाची – बुकिंगवेळी कॅन्सलेशन चार्ज आणि रिफंड प्रोसेसला पूर्ण माहिती देणे बंधनकारक असणार आहे.