पार्थ पवारांचे जमीन प्रकरण दाबले तर ईडी आणि अमित शहांच्या विरोधात याचिका, अंजली दमानियांचा इशारा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याचे पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण फारच गंभीर आहे. त्यामुळे आता हे प्रकरण दाबले गेले तर मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि ईडीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज दिला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व अजित पवार यांच्या दिल्लीतील भेटीच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी हा इशारा दिला आहे.

पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण गंभीर असून याप्रकरणी चौकशी सुरू होणार आहे. त्याबद्दलच अजित पवारांनी अमित शहांची भेट घेऊन विनवणी केली असणार, असा टोला अंजली दमानिया यांनी मारला. यापूर्वी जरांडेश्वर कारखाना घोटाळा, शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा प्रकरणात त्यांना अभय मिळाले आहे. पण आता हेही प्रकरण दाबले गेले तर ईडी आणि अमित शहा यांच्याविरोधात याचिका दाखल करणार आहे. हे खालच्या दर्जाचे राजकारण असून, शिक्षा ही सर्वांना समान झाली पाहिजे. यातून कोणाचाही बचाव करता कामा नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.