न्या. सूर्य कांत आज घेणार शपथ, पाच कोटी प्रलंबित खटल्यांचे नव्या सरन्यायाधीशांपुढे आव्हान

देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्या. सूर्य कांत हे उद्या शपथ घेणार आहेत. सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा भर देशातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यावर राहणार आहे. देशभरात 5 कोटी खटले प्रलंबित आहेत. हेच सर्वात मोठे आव्हान असल्याचे न्या. सूर्य कांत म्हणाले.

पदभार स्वीकारण्यापूर्वी पत्रकारांसोबत केलेल्या औपचारिक चर्चेत त्यांनी आपल्या कार्यकाळाचा रोडमॅप दिला. न्या. सूर्य कांत यांची 30 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशपदासाठी नियुक्ती जाहीर केली होती. सरन्यायाधीश म्हणून न्या. सूर्य कांत यांचा 15 महिन्यांचा कार्यकाळ राहणार आहे. ते 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होतील.

न्या. सूर्य कांत यांनी प्रलंबित खटल्यांबाबत चिंता व्यक्त केली. देशभरात 4.6 कोटींपेक्षा जास्त खटले प्रलंबित आहेत. सर्वोच्च न्यायालयात हा आकडा 90 हजारांवर गेला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयांकडून अहवाल मागवू. अनेक खटले योग्य प्रकारे मध्यस्थी केल्यास कमी होऊ शकतात. त्यामुळे वादविवाद कमी करण्यासाठी योग्य मध्यस्थीवरही आपण भर देणार आहोत. यामुळे न्यायालयांवरील ताण कमी होईल, असे न्या. सूर्य कांत म्हणाले.

डिजिटल कोर्ट आणि एआयचा वापर

न्या. सूर्य कांत यांनी न्यायालयीन प्रक्रियेत एआयचा वापर करता येऊ शकतो, असे मत मांडले. डिजिटल कोर्ट आणि एआयद्वारे बदल घडविता येईल, मात्र एआयचा उपयोग मर्यादित असावा, असेही ते म्हणाले.

शपथविधीला 7 देशांचे सरन्यायाधीश उपस्थित राहणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या न्या. सूर्य कांत यांना सोमवारी सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या सोहळ्यात भूतान, केनिया, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका आणि मॉरिशस या देशांचे सरन्यायाधीश कुटुंबीयांसह सहभागी होणार आहेत. हे प्रथमच होत आहे.

कोण आहेत नवे सरन्यायाधीश?

न्या. सूर्य कांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरयाणातील हिसार येथे एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1984 मध्ये एका छोटय़ा शहरात वकिली सुरू केल्यापासून देशाचे सरन्यायाधीश होईपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी राहिलेला आहे. राष्ट्रीय आणि घटनात्मकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक निकालांमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे.

सोशल मीडिया नव्हे अनसोशल मीडिया

न्या. सूर्य कांत यांना सोशल मीडियावर होत असलेल्या न्यायाधीशांच्या ट्रोलिंगबाबत विचारले असता ते म्हणाले की, स्पष्टपणे सांगायचे तर सोशल मीडियाला मी ‘अनसोशल मीडिया’ म्हणतो. ऑनलाइन कॉमेंटचा माझ्यावर कधीही परिणाम झाला नाही. न्यायाधीश आणि निकालांवर संतुलित टीका कायम स्वीकारार्ह असते, असे न्या. सूर्य कांत यांनी सांगितले.