
कुंभमेळ्यासाठी नाशिक येथील तपोवनात असलेली 10 वर्षांच्या आतील झाडे तोडली जातील, जुनी झाडे ठेवली जातील, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा पर्यावरणप्रेमी व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी साताऱयात खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांचे म्हणणे म्हणजे ‘पोरांना मारायचे अन् आई बापांना ठेवायचे,’ असे आहे. मात्र आपले आई-बाप असलेल्या नाशिकच्या तपोवनातील एकाही झाडाला आम्ही हात लावू देणार नाही, असे स्पष्ट मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी साताऱयात माध्यमांशी बोलताना आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. वृक्ष लागवडीबाबत कागदोपत्री सक्सेस रेट दाखविला जातो. त्याच्या तपासणीची गरज आहे. उजाड माळरानावर खड्डे तयार केले जात आहेत. त्या ठिकाणी माती चांगली तिथे पाणी चांगले नाही. 15 फूट उंचीची झाडे लावली जात आहेत, तेवढी झाडे खाली गेली पाहिजेत. विनाकारण खर्च नको, हीच आपली भूमिका असल्याचेही सयाजी शिंदे म्हणाले. कोणत्याही साधुसंतांचा आपण अपमान केलेला नाही. आपण कधीही जातिभेद मानत नाही असे ते म्हणाले.


























































