
मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱयांना निवडणुकीची डय़ुटी लावण्यात आली होती, परंतु डय़ुटी लावूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या आणि निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱया कर्मचारी व अधिकाऱयांविरोधात उद्या, 12 जानेवारीपासून कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिका निवडणूक प्रक्रियेत नियुक्त कर्तव्ये पार पाडण्यास गैरहजर राहिलेल्या एकूण 6 हजार 871 अधिकारी व कर्मचाऱयांना महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यापैकी 2 हजार 350 अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले आहेत, तर वारंवार सूचना देऊनही प्रशिक्षण, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया अथवा नेमून दिलेल्या निवडणूक कर्तव्यामध्ये हजर न राहणाऱया 4 हजार 521 अधिकारी व कर्मचाऱयांविरुद्ध 12 जानेवारीपासून पोलीस कारवाई केली जाणार आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार हा कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. महापालिकेच्या मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मतदान प्रक्रियेविषयीचे पहिल्या व दुसऱया टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱयांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक होते. जे अधिकारी आणि कर्मचारी प्रशिक्षण सत्रास गैरहजर राहिले आहेत, त्यांना 10 जानेवारीला अंतिम संधी देण्यात आली होती. 11 जानेवारीपासून निवडणूक कायद्यांतर्गत कडक शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला होता. त्यानुसार आजपासून कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांचा समावेश
महापालिकेकडून ज्या कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे, त्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांसह राष्ट्रीय बँक, बेस्ट, बीएसएनएल, एचपीसीएल, विमा कंपनी, एलआयसी, म्हाडा, एमटीएनएल, टपाल खाते, रेल्वे, आरसीएफ, नाबार्ड या शासकीय/निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम आदींतील अधिकारी व कर्मचाऱयांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱयांविरोधात गुन्हा नोंद, दंडात्मक कारवाई तसेच विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.




























































