घोर अपमान… राजस्थानमध्ये शिवरायांसह महाराणी पद्मावतींच्या फोटोंचा बाथरुममध्ये वापर; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानमधील सीकरी येथून अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे. येथील ‘मिलन बँक्वेट हॉल’मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मावती यांच्या प्रतिमा चक्क बाथरुमच्या भिंतीवर लावण्यात आल्याचे उघड झाले आहे. या निंदनीय प्रकारामुळे केवळ राजस्थानच नाही तर संपूर्ण देशभरातील शिवप्रेमी आणि हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बँक्वेट हॉलच्या स्वच्छतागृहाच्या भिंतीवर महापुरुषांचे फोटो लावलेले काही लोकांच्या निदर्शनास आले. ज्या महापुरुषांनी देशाची अस्मिता आणि संस्कृती जपण्यासाठी प्राणांची आहुती दिली, त्यांचा अशा प्रकारे अपमान केल्याने हिंदू समाज आक्रमक झाला आहे. हा प्रकार समोर येताच स्थानिक शिवप्रेमींनी आणि हिंदू कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाचा निषेध केला.

या घटनेमुळे हिंदू अस्मितेवर आणि आस्थेवर थेट आघात झाल्याची भावना व्यक्त होत आहे. “ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि ज्या महाराणी पद्मावतींनी आपल्या सन्मानासाठी जोहार केला, त्यांचा असा घोर अपमान कदापि सहन केला जाणार नाही, अशा शब्दांत सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही याबाबत ट्विट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि अपमानजनक असल्याचे ते म्हणाले. तसेच हे फोटो तात्काळ हटवून संबंधितांनी माफी मागावी अशी मागणीही आठवले यांनी केली. तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हा हॉल हरियाणाचे मंत्री मूलचंद शर्मा यांचा असल्याचा दावा केला आहे.

व्हिडीओ व्हायरल, संताप…

दरम्यान, ‘मिलन बँक्वेट हॉल’मधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हॉलमधील व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतेय की बाथरूमच्या भिंतीवर एका बाजुला शिवरायांचा जिरेटोप घातलेला फोटो आणि दुसऱ्या बाजुला महाराणी पद्नावती यांचा फोटो लावण्यात आलेला आहे.

कारवाईची मागणी

दरम्यान, संबंधित हॉल मालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच यामागे कोणता हेतू होता, याची सखोल चौकशी व्हावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. सध्या या परिसरात तणावाचे वातावरण असून, दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.