माभळे येथील घरे बनली धोकादायक, संरक्षण भिंत नसल्याने नागरिक चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माभळे येथे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असताना डोंगर खोदाईमुळे परिसरातील घरे धोकादायक स्थितीत पोहोचली आहेत. संरक्षण भिंत (रिटेनिंग वॉल) न बांधताच मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आल्याने माभळे वाशीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डिंगणकर दवाखान्यासमोर सुरू असलेल्या खोदकामामुळे डोंगराचा मोठा भाग कापण्यात आला आहे. यामुळे माती घसरणे, दरडी कोसळणे किंवा पावसाळ्यात भूस्खलन होण्याचा धोका वाढला असून जवळील घरांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, उत्खननामुळे घरांच्या पायाभूत संरचनेवर ताण येत आहे. पावसाळ्यात पाणी वाहून जाऊन भूस्खलनाचा धोका संभवतो.संरक्षण भिंत नसल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकते.

ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन व ठेकेदारांकडे तातडीने संरक्षण भिंत उभारण्याची मागणी केली आहे. “कामाच्या घाईत आमच्या जीविताशी खेळ होऊ नये,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.दरम्यान, स्थानिकांनी प्रशासनाने त्वरित पाहणी करून सुरक्षिततेचे उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे.