
दोन कुटुंबे एकत्र येत रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करणे म्हणजे आयुष्यभराचे सोबती असल्याचे मानले जात होते, परंतु आता अनेक जोडपी लग्नाच्या अवघ्या काही वर्षांमध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेत आहेत. घटस्फोटाचा दर हा अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. घटस्फोट मागणाऱया महिला या 25 ते 34 वयोगटातील असून 40 टक्के प्रकरणांमध्ये लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांत घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
पीएलएफएस सर्व्हे (2017-24), कायदा मंत्रालय, दिल्ली हायकोर्ट, लाइव्ह लॉ, एनसीआरबी, एनएफएचएस-5 (2019-21), कौटुंबिक कोर्ट व जिल्हा न्यायालये. एडजुआ लीगल्स गुगल ऍनालिटिक्स 2025 च्या अहवालानुसार, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, लखनऊ, हैदराबाद आणि कोलकात्यात घटस्फोटाची प्रकरणे गेल्या तीन वर्षांत 3 पटीने वाढली आहेत. घटस्फोटित महिला-पुरुषांचा कोणताही सरकारी राष्ट्रीय डेटा उपलब्ध नाही. मात्र देशात घटस्फोटाचे सरासरी वय महिलांमध्ये 31, तर पुरुषांत 36 आहे, असे खासगी मार्केट रिसर्च कंपन्यांचा अभ्यासावरून स्पष्ट होत आहे. घरगुती हिंसाचार, अनैतिक संबंध किंवा कौटुंबिक दबावासारखी घटस्फोटाची कारणे आहेत. महाराष्ट्रात 18.7 टक्के दर हा सर्वात जास्त आहे. कर्नाटक 11.7 टक्के, पश्चिम बंगाल 8.2 टक्के, दिल्ली 7.7 टक्के, तामीळनाडू 7.1 टक्के, तेलंगणा 6.7 टक्के, राजस्थान 2.5 टक्के घटस्फोट झाल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. या अभ्यासानुसार, जानेवारी, सप्टेंबर आणि मे महिन्यात सर्वात जास्त घटस्फोट घेण्यासाठी याचिका दाखल केल्या जात असून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, मार्च महिन्यात सर्वात कमी याचिका दाखल झाल्या आहेत.



























































