
ग्रामीण भागातील जलजीवन मिशनवर नेहमी चर्चा होते, पण मुंबईतही तशीच परिस्थिती आहे. मुंबईच्या पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे समुद्राच्या खाऱया पाण्याचे गोडे पाणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून समुद्राचे खारे पाणी गोडे करणाऱया प्रकल्पाची उभारणी मुंबईसाठी करणे काळाची गरज आहे, असे मत शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्यक्त केले.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेतान सुनील प्रभू यांनी मुंबईतील पाण्याच्या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. आता काही दिवसांनी रंगपंचमी आहे. मागील वर्षीही मुंबईतील अपुऱया पाण्याचा विषय मी सभागृहात मांडला होता. मागील वर्षी रंगपंचमी खेळल्यावर आंघोळीला पाणी नव्हते ही परिस्थिती होती. ही परिस्थिती यावेळी येऊ देऊ नका असे प्रभू म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा खारे पाणी गोडे करण्याचे प्रकल्प या शहरात यावेत यासाठी प्रयत्न केले. पुढील सरकारने ते प्रकल्प बासनात बांधून का ठेवले माहिती नाही. तलावातील पाणी आणण्याचे प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे समुद्राचे खारे पाणी गोडे करून मुंबईकरांना देण्यासाठी पुठे तरी योजना मुंबई किंवा ठाण्यात एक दिवस करणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात मुंबईपासून करा असे सुनील प्रभू म्हणाले.

























































