
स्त्रियांनी धर्म आणि अध्यात्म या दोन्ही ठिकाणी नेतृत्व करावे अशी भूमिका श्रीसमर्थ रामदासांनी मांडली आणि त्यानुसार त्यांनी अठरा स्त्रियांना रामदासी मठांचे मठपती म्हणून नेमले. या सर्व स्त्री- मठपतींचा उल्लेख ‘गिरिधर- बखरी’मध्ये आहे. वेणाबाई व बाईयाबाई (मिरज मठ), अंबिकाबाई (राशिवडे व वाळवे), नबाबाई (तापीतीर, गुजरात), मनाबाई (राजांगणी), सखाबाई व कृष्णाबाई (चाफळ), अन्नपूर्णाबाई (टाकळी), सतीबाई (महाबळेश्वर), आपाबाई, द्वारकाबाई, गंगाबाई, मुधाबाई, बाकुबाई, भीमाबाई, गोदाबाई, अंताबाई (कृष्णातीर) आणि चिमणाबाई ऊर्फ आक्काबाई (सज्जनगड मुख्यालय) या त्या अठरा स्त्री-मठपती होत. चिमणाबाई ऊर्फ आक्कास्वामी लिहिण्या-वाचण्याबरोबरच दफ्तरी कामे, घोडेस्वारी, तलवारबाजी यात अतिशय निपुण होत्या. समर्थ रामदास स्वामींच्या पुण्यतिथीला ‘दासनवमी’ उत्सवाचे स्वरूप आक्कास्वामी ऊर्फ आक्काबाईंनीच दिले आहे. श्रीसमर्थांच्या संप्रदायातल्या स्त्रियांना मठपती होण्याबरोबरच उभे राहून कीर्तन करण्याचा अधिकारही होता. श्रीसमर्थांच्या काळात खरंतर स्त्रियांना आपल्याच घरात मोकळेपणी वावरण्याचे स्वातंत्र्य नव्हते. अशा काळात समर्थांच्या शिष्या मठपती तर बनल्याच पण मठपती म्हणून मंदिरांमध्ये उभे राहून कीर्तनाद्वारे समाजाला त्या आध्यात्मिक ज्ञानही देऊ लागल्या.



























































