मुंबईतील अनधिकृत बांगलादेशी घुसखोरांवरून अनिल परब आक्रमक; ‘टास्क फोर्स’ नेमण्याची विधान परिषदेत मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील विविध वस्त्यांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा विधान परिषदेत चांगलाच गाजला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले. “पुढच्या तीन महिन्यांत विशेष टास्क फोर्स नेमून प्रत्येक वस्तीची झाडाझडती घ्या आणि घुसखोरांना बाहेर काढा, अन्यथा पुढच्या अधिवेशनात आम्हाला पोलीस आणि महापालिकेचे दरपत्रक जाहीर करावे लागेल,” असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.

विधान परिषदेत बोलताना अनिल परब यांनी मुंबईतील वाढत्या अनधिकृत लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, “पुढच्या अधिवेशनात बांग्लादेशींना मुंबईमध्ये ठेवण्यासाठी पोलीस आणि महापालिका यांचे दरपत्रक आम्हाला जाहीर करावं लागेल. म्हणून सरकारला विनंती आहे, याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. पुढच्या तीन महिन्यात टास्क फोर्स नेमून प्रत्येक वस्त्यांची झाडाझडती घेऊन बांगलादेशी, गुन्हेगार शोधून देशाच्या सुरक्षेला धोका होणार नाही, याची जबाबदारी सरकार घेणार का?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.