
मुंबई महापालिकेच्या सुरक्षारक्षक आणि अधिकारी पदाची भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे जलाशय, रुग्णालय, स्मशानभूमी, प्रसूतिगृह अशा अतिसंवेदनशील ठिकाणी सुरक्षा रक्षकांचा तुटवडा आहे. यामुळे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. दोन वर्षे उलटूनही भरती प्रक्रियेबाबत ठोस निर्णय झालेला नाही. यावर तातडीने तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी युवासेनेने केली आहे.
यासंदर्भात तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यांनी रिक्त पदांचा अहवाल मागवून भरती प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुढे काहीही झाले नाही. विद्यमान अतिरिक्त आयुक्तांनी यावर तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी वरळी विधानसभा मतदारसंघाचे युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांकडे पाठपुरावा करणार
विरोधी पक्षनेत्या व तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी पाठपुरावा करत भरती प्रक्रियेसाठी प्रयत्न केले होते, मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यावर ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे या विषयावर आयुक्तांसोबत पुन्हा चर्चा करून हा विषय मार्गी लावण्यासाठी तसेच अतिरिक्त आयुक्तांसोबत चर्चा करून बैठकीचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले. याबाबत पाटील यांनी एक पत्रही किशोरी पेडणेकर यांना दिले.




























































