
आंबा काजू बागायतीच्या हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत सरकारने नुकसान भरपाई जाहिर न केल्यामुळे 23 मार्च रोजी नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्यानंतर या आंदोलनाशी संबंधित असलेल्या नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये माजी आमदार वैभव नाईक यांना देखील याबाबतची नोटीस पोलिसांनी बजावली असून, शासन पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपू पाहत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.
आंबा, काजू बागायतदार व व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढोके व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर नांदगाव हॉटेल ग्रीनफिल्ड या ठिकाणी 23 मार्च रोजी 11 वाजता हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 एप्रिल पर्यंत मनाई आदेश लागू असून या कालावधीत आंदोलनादरम्यान कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य कृती किंवा चिथावणीखोर वक्तव्य, अप्रिय घटना घडल्यास व यामुळे शांतता भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास याची जबाबदारी आपली राहील असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांना या नोटिसा बजावण्यात आल्याने आंबा, काजू बागायतदरामध्ये नाराजी व्यक्त केली आहे.



























































