
”एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरातांचा रस्ता दिपक केसरकरांनी दाखवला व अशोक खरातांनी शिंदेना गुवाहटीचा रस्ता दाखवला”, अशी सणसणीत टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. विनायक राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक खरात प्रकरणात जे जे मंत्री सामील आहेत त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी देखील केली आहे.
”कॅप्टन खरात याचे तोंड ज्या दिवशी उघडेल तेव्हा या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचं खरं रूप महाराष्ट्रासमोर येईल. या प्रकरणातून वाचवण्यासाठी फडणवीसांवर दबाव येईल पण त्यांनी या दबावाला भीक न घालता सर्व मंत्र्यांचे व्हिडीओ समोर आणावे व त्या कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करा. अधिवेशन दोन दिवस आहे. या अधिवेशनात यावर सखोल चर्चा व्हायला हवी. पण दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रात अंधश्रद्धा विधेयक मंजूर होऊन सुद्धा महाराष्ट्रातल्या मंत्रीमंडळातले अनेक मंत्री व रुपाली चाकणकरांसारख्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी कॅप्टन खरातांचे पाय धुत होते हे अत्यंत शरमेची गोष्ट आहे”, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
”दीपक केसरकर यांची SIT चौकशी करण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरातांचा रस्ता दिपक केसरकरांनी दाखवला व अशोक खरातांनी शिंदेना गुवाहटीचा रस्ता दाखवला. भ्रष्टाचारी व कलंकित असलेल्या कॅप्टन खराताच्या जाळ्यात किंबहुना त्यांच्या सेवेत जे मंत्री मग्न झाले होते त्यांची मंत्रीमंडळातू हकालपटी व्हायला हवी, असे विनायक राऊत म्हणाले.
”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांची हकालपट्टी करायला हवी होती. फडणवीसांना माझी विनंती आहे की या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत खरात यांचा घात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खरातांच्या जीवाचं रक्षण करणं हे मुख्यमंत्र्यांचा प्रथम कर्तव्य आहे. हे प्रकरण महाराष्ट्राचं एपस्टीन फाईलच आहे”, असं ते म्हणाले.
























































