
प्रयागराज महाकुंभमध्ये चर्चेत आलेली मोनालिसा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. आता तिने ‘द डायरी ऑफ मणिपूर’चे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्यावर पत्रकार परिषद घेत, गंभीर आरोप केले आहेत. मोनालिसाच्या म्हणण्यानुसार, सनोज मिश्रा यांनी तिला अनेक वेळा अयोग्यरित्या स्पर्श केला आहे. तिने तिच्या कुटुंबावरही आरोप केला आहे की त्यांनी तिला मदत केली नाही.
मोनालिसाने नुकतेच केरळमध्ये राहणाऱ्या तिचा प्रियकर फरमान खानसोबत लग्न केले आहे. ती सध्या कोचीमध्ये राहते. मंगळवारी कोचीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत भावनाविवश होऊन तिने गंभीर आरोप केले.
मोनालिसा पत्रकार परिषदेत म्हणाली, “सनोज मिश्रा चांगला माणूस नाही. चित्रपटादरम्यान त्याने मला अनेक वेळा अयोग्यरित्या स्पर्श केला. मी त्याच्या स्पर्शाबद्दल माझ्या कुटुंबालाही सांगितले, पण त्यांनी मला पाठिंबा दिला नाही. माझ्यासोबत काय घडले हे मला माहीत आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे. मला फक्त न्याय हवा आहे. सनोज मिश्राने मला दोनदा स्पर्श केला. जेव्हा मी माझ्या कुटुंबाला सांगितले, तेव्हा ते म्हणाले, ‘नाही, नाही, हा तुझा पहिला चित्रपट आहे.”
मोनालिसाच्या पत्रकार परिषदेनंतर सनोज मिश्रा यांनीही एक निवेदन जारी केले. त्यांनी आरोप केला की, माझ्या विरोधात एक कट रचला जात आहे. मोनालिसाला माझ्या विरोधात खोटे बोलण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मी मोनालिसाला माझी बहीण मानतो. मोनालिसा नेहमीच माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलायची, पण रातोरात असं काय घडलं की ती माझ्या विरोधात बोलू लागली?
मोनालिसाने ११ मार्च रोजी तिरुवनंतपुरम येथील एका मंदिरात हिंदू रितीरिवाजानुसार, केरळमधील तिचा प्रियकर फरमान खानसोबत लग्न केले. दुसऱ्या दिवशी, तिने या घटनेबद्दल तपशील देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही पैलू देखील सांगितले, ज्यामुळे तिला हे पाऊल उचलावे लागले.





























































