
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ हे पुन्हा एकदा हिंदुस्थानविरोधात बरळले आहेत. हिंदुस्थानने कोणतेही फॉल्स फ्लॅग ऑपरेशन अर्थात लपून हल्ला केल्यास आम्ही हिंदुस्थानच्या पूर्वेकडील महानगर कोलकातावर हल्ला करू, अशी पोकळ धमकी आसिफ यांनी दिली. तीन दिवसांपूर्वीच आसिफ यांनी अशीच धमकी दिली होती.
सियालकोटमध्ये पत्रकर परिषदेत आसिफ म्हणाले, की हिंदुस्थानने आपल्या ताब्यातील काही पाकिस्तानी नागरिकांचा वापर करुन लपून हल्ला केल्यास संघर्ष सीमेपुरताच मर्यादित राहणार नाही. कुठेही मृतदेह ठेवायचे आणि हे पाकिस्तानी दहशतवादी होते, असा दावा केल्यास पाकिस्तान कोलकात्यावर हल्ला करुन प्रत्युत्तर देईल. यावेळी भारताला आणखी जास्त लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागेल, असे आसिफ म्हणाले.
ख्वाजा आसिफ यांच्या या विधानावर भारताकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केरळममधील एका कार्यक्रमात पाकिस्तानला इशारा दिला होता. पाकिस्तानने पुन्हा काही कारवाई केल्यास हिंदुस्थान निर्णायक कारवाई करेल, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला होता. त्यावर आसिफ यांनी तीन दिवसांपूर्वी पोकळ धमकी दिली होती.


























































