
प्रदूषणकारी विराज प्रोफाईल्स प्रा.लि. कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांनी वेळोवेळी संताप व्यक्त केला असतानाच आता या कंपनीच्या विस्तारीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. या विस्तारीकरणाला परवानगी दिली तर आम्हाला मरण द्या, ना लोकसभा.. ना विधानसभा.. सबसे बडी ग्रामसभा.. अशा घोषणा देत भूमिपुत्रांनी आज जबरदस्त एल्गार पुकारला. कंपनीच्या विस्तारीकरणाला कठोर विरोध करण्यात आला असून पर्यावरणीय जनसुनावणीमध्ये शेकडो ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.
तारापूरमधील मान या गावामध्ये विराज प्रोफाईल्स ही कंपनी असून आतापर्यंत अनेकदा तेथे दुर्घटना घडल्या आहेत. या कंपनीतील प्रदूषणामुळे परिसरातील ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना अनेक आजार जडले आहेत. अशा परिस्थितीत मान या गावालगत असलेल्या वारांगडे या गावात कंपनी आपला विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पर्यावरणीय मंजुरी मिळविण्यासाठी आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने कंपनीतच जनसुनावणी घेण्यात आली. या सुनावणीसाठी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक आले होते. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर विविध प्रश्नांचा भडिमार करीत विस्तारीकरणाला आपला विरोध दर्शवला.
- सध्या असलेल्या विराज प्रोफाईल्स कंपनीतून जे प्रदूषण होत आहे त्यामुळे लगतच्या गावांमधील बोअरिंग व विहिरीतील पाणी लालसर झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरदेखील परिणाम झाला आहे.
- कंपनीच्या विस्तारीकरणानंतर रोज ४ हजार २०० किलोलिटर पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे आधीच संवेदनशील असलेल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढल्याची भीती जनसुनावणीत व्यक्त करण्यात आली.
- पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन अहवाल हा अपुरा असून एकत्रित परिणामांचा अभ्यास केला नसल्याचे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. ही सुनावणी सार्वजनिक ठिकाणी का घेतली नाही असाही सवाल करण्यात आला.
जनसुनावणीच रद्द करा
आज झालेल्या पर्यावरणीय जनसुनावणीसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कंपनीचे विस्तारीकरण ज्या वारांगडे गावात होणार आहे तेथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेची ना हरकत घेतली नाही. त्यामुळे ही जनसुनावणी कायद्याला धरून नसून ती तत्काळ रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या सुनावणीसाठी विराज प्रोफाईल्सचे मालक नीरज कोचर, उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, प्रांताधिकारी मदनुरकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सबनीस आदी उपस्थित होते.





























































