अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना अनोखी श्रद्धांजली, मदुराईमध्ये केले 270 वृक्षांचे रोपण

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली म्हणून, मदुराईस्थित स्वयंसेवी संस्था, परवाई फाउंडेशनतर्फे रविवारी सूर्या नगरजवळील कोडिकुलम येथे 270 वृक्षांची रोपे लावण्यात आलेली आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली स्वरुप ही झाडं असतील याच हेतूने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. “प्रत्येक रोप एका जीवनाचे प्रतीक आहे, म्हणूनच अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना आमची नम्र श्रद्धांजली आहे,” असे एनजीओचे संस्थापक चोलन कुबेंद्रन म्हणाले.

परवाई फाउंडेशन कायमच पर्यावरण स्नेही उपक्रम राबवत आलेली आहे. विशेषतः मदुराई जिल्ह्यातील शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण मोहीम या संस्थेतर्फे कायम केली जात असते. अहमदाबाद अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहताना, दीर्घकालीन वृक्षांची तसेच तिथल्या वातावरणासाठी योग्य असतील अशाच वृक्षांच्या प्रजातींची निवड करण्यात आलेली आहे. या मोहिमेमध्ये संस्थेचे स्वयंसेवक, शालेय विद्यार्थी आणि रहिवासी यांनी या वृक्षारोपण लागवड मोहिमेत हिरीरीने पुढाकार घेतला होता. स्थानिकांच्या सहकार्याने रोपांची देखभाल, पाणी देणे आणि कुंपण घालणे यासह रोपांची देखभाल करण्याची योजना देखील फाउंडेशनची आहे.

गुरुवारी दुपारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सना घेऊन जाणारे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान (AI171) मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये कोसळले. त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला. फक्त एकाच व्यक्तीचे प्राण वाचू शकले. डॉक्टरांच्या वसतिगृहावर विमान कोसळले, यामुळे अनेक डॉक्टरांनाही आपला जीव गमवावा लागला. या अपघातामध्ये एकूण 290  जणांचा मृत्यू झाला आहे.