
अहिल्यानगर शहराच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते यांची भाजपने निवड केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत नाराजी उफाळून येण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच या संदर्भामध्ये एकत्रित बैठक घेऊन पक्षाकडे भूमिका मांडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समोर आले आहे.
अहिल्यानगर शहराच्या जिल्हाध्यक्षपदासाठी गेल्या महिन्याभरापासून चांगल्याच चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात विखे गटाकडून व प्रा. राम शिंदे गटाकडून वेगवेगळी नावे पक्षश्रेष्ठींकडे गेलेली होता. शिर्डी या ठिकाणी पक्षाचे निरीक्षक मंत्री जयकुमार रावल आल्यानंतर सुरुवातीला त्यांनाही नावे देण्यात आलेली होती. त्यानंतर पुन्हा एकदा याबाबत बैठक घेण्यात आली. पण नावावर एकमत होत नसल्यामुळे हा विषय वरिष्ठांपुढे गेला होता. आपल्याच गटातील इच्छुकाला संधी मिळावी, अशी दोन्ही गटांची मागणी कायम होती. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनीसुद्धा पक्षश्रेष्ठींकडे त्या संदर्भात बोलणे केले होते. पण दुसरीकडे राज्याचे जलसंधारणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीसुद्धा दोन ते तीनजणांची नावे पाठवली होती. दोघांनीही आपापल्या परीने प्रयत्न केल्यामुळे ही निवड लांबली होती. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर शहराचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
भाजपाने नुकतेच अनिल मोहिते यांचे नाव निश्चित केल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. अहिल्यानगर शहराशी त्यांचा संबंध काय, असा सवालही काही भाजप पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर उपस्थित केला. ही निवड करताना पक्षाने कोणाच्याही भावनेचा आदर केलेला नाही; तसेच ज्यांच्या निवडी व्हायला पाहिजे होत्या, त्या झालेल्या नाही, अशी भावना व्यक्त करत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यातच आगामी काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला शहरातील काय माहिती आहे? असा सवाल उपस्थित केला असून, लवकरच या संदर्भात एक बैठक घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. भाजपने जाहीर केलल्या निवडीमुळे सध्या अंतर्गत कुरघोड्या पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे आता मोहिते यांची निवड सार्थ ठरते का वादात सापडते, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.