Air India Plane Crash : मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत जाहीर, टाटा ग्रुपनंतर एअर इंडियाची घोषणा

अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आणि एकमेव बचावलेल्या प्रवाशाला तात्काळ आर्थिक मदत म्हणून एअर इंडियाने प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम टाटा सन्सने यापूर्वी जाहीर केलेल्या प्रत्येकी 1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईच्या व्यतिरिक्त आहे.

एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये शेअर करत ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “या अपघातात जीव गमावलेल्या सर्व प्रवाशांच्या कुटुंबियांसोबत आम्ही उभे आहोत. आमचे पथक या कठीण काळात सर्वतोपरी मदत करत आहेत.”

दरम्यान, गुरुवारी दुपारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान (फ्लाइट AI171) उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेहगनीनगर परिसरात कोसळले. या दुर्घटनेत 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा आणि खालील 29 जणांचा मृत्यू झाला, तर एकमेव प्रवासी (आसन क्रमांक 11ए) वाचला. याशिवाय बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाचेही मोठे नुकसान झाले आहे.