
अहमदाबादमध्ये 12 जून रोजी एअर इंडियाचे विमान वसतिगृहाच्या छतावर कोसळले. या विमान अपघातात 241 प्रवाशांसह काही विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला. या अपघातग्रस्त विमानाच्या ढिगाऱ्यातून सुमारे 70 तोळे, 80 हजार रुपये रोख रक्कम, भगवद्गीता आणि प्रवाशांच्या काही वस्तू सापडल्या. या सर्व वस्तू सध्या सरकारी संरक्षणाखाली असल्या तरी या वस्तूंचा दावेदार कोण? हा प्रश्न आहे.
कोणत्याही अपघातातून जप्त केलेल्या वस्तूंच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारची असते. नियमानुसार विमान अपघाताच्या ठिकाणाहून जप्त केलेल्या वस्तू प्रथम स्थानिक पोलिस आणि प्रशासन ताब्यात घेतात. त्यानंतर, तपास पूर्ण होईपर्यंत हा मुद्देमाल सरकारी तिजोरीत जमा राहतो.
विमान अपघातानंतर ढिगाऱ्यातून सापडलेल्या वस्तूंच्या मालकीबाबतचे नियम अगदी स्पष्ट आहेत. अपघातात सापडलेल्या वस्तूंचा मालक शोधण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालय आणि स्थानिक प्रशासन एकत्रितपणे काम करतात. यासाठी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाते. अशा परिस्थितीत दागिने आणि इतर वस्तू खरेदी केलेली पावती किंवा इतर कागदपत्रे उपलब्ध असतील तर ती ओळख पटवणे सोपे होते.
अपघातातील मृतांचे कुटुंब आणि जवळचे नातेवाईक या वस्तूंवर दावा करू शकतात. या दरम्यान, संबंधित कागदपत्रे, मृत व्यक्तीशी असलेल्या नातेसंबंधाचा पुरावा, प्रवास कागदपत्रे आणि इतर कायदेशीर पुरावे देखील सादर करावे लागतात. जर सादर केलेले सर्व पुरावे बरोबर आढळले तर वस्तू जवळच्या नातेवाईकाला सुपूर्द केल्या जातात. जर ढिगाऱ्यातून सापडलेल्या वस्तूंसाठी कोणताही दावेदार सापडला नाही, तर सरकार अशा वस्तू सरकारी मालमत्ता म्हणून जप्त करते.