
अहमदाबाद विमान दुर्घटनेचे कटकारस्थान रचल्याचा संशय मोदी सरकारने व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने ब्लॅक बॉक्समधील डेटाचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. एएआयबी अर्थात विमान अपघात तपास ब्युरो याप्रकरणी सखोल चौकशी करत असून ब्लॅक बॉक्स हिंदुस्थानात आहे. तो परदेशात पाठवला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात मोहोळ बोलत होते. ते म्हणाले ही एक दुर्दैवी घटना होती. एएआयबी प्रत्येक कोनातून त्याची चौकशी करत आहे. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे आणि विविध तपास यंत्रणा एकत्रितपणे तपासात सहभागी आहेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अहमदाबादहून लंडनला जाणारे एआय171 हे विमान उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच मेडिकल हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळले. या अपघातात 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह 270 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातातून केवळ एकच प्रवासी वाचला होता.
अहवाल तीन महिन्यांत येण्याची अपेक्षा
अपघात इंजिनमध्ये बिघाड, इंधन पुरवठय़ातील समस्या की इतर कोणत्या कारणामुळे झाला याबाबतचा तपास सुरू आहे. ब्लॅक बॉक्समध्ये असलेल्या सीव्हीआर आणि एफडीआरची तपासणी केली जात आहे. अहवाल 3 महिन्यांत येण्याची अपेक्षा आहे असेही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. डीसीजीएच्या आदेशानुसार एअर इंडियाच्या सर्व 33 ड्रीमलायनर विमानांची तपासणी करण्यात आली आहे. सर्व विमाने सुरक्षित असल्याचे आढळले आहे, असा दावाही मोहोळ यांनी केला.